तारीख : 19-06-2025श्रेणी :महाराष्ट्र
तारीख : 15-07-2025श्रेणी :महाराष्ट्र
देहूगाव (Dehugaon) : तब्बल १७ वर्षांनंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पुन्हा एकदा आळंदी मार्गे देहू नगरीत परतणार आहे. ही ऐतिहासिक माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या निमंत्रणाला मान
श्री संत तुकाराम महाराजांची पालखी श्री क्षेत्र देहूगाव येथे आपला ३५ दिवसांचा प्रवास संपवून पुन्हा देहू नगरीत २१ जुलैला येणार आहे. यंदा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष व संत ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० वे जयंती वर्ष व श्री संत तुकाराम महाराजांचे ३७५ वे वैंकुठगमण वर्षाचा दुग्धशर्करा योग असल्याने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने ११ जुलै २०२५ रोजी श्री संत तुकाराम महाराज संस्थानला आपण २० जुलै २०२२५ रोजी आळंदी येथे पालखी मुक्कामी आणावी असे निमंत्रण दिले होते. याचा स्विकार करून श्री संत तुकाराम महाराज संस्थानने २० जुलैला आपला आळंदी मुक्काम निश्चित केला आहे.
३५ दिवसांच्या वारीनंतर २१ जुलैला पालखीचे देहूला आगमन
यासाठी पालखी सोहळा प्रमुखांनी पुण्यातील एक मुक्काम कमी करून १९ जुलैला पालखी नेहमीच्या मार्गाने पिंपरीगांव येथे विठ्ठल मंदिरात मुक्कामी येणार असून २० जुलैवा पालखी सकाळी भोसरी मार्गे आळंदीकडे मार्गस्थ होईल. २० जुलैला तारखेलाचा मुक्काम करून पालखी डुडुळगाव, मोशी, टाळगाव चिखली, तळवडे, विठ्ठलनगर मार्गे देहूत २१ जुलैला दुपारी २ वाजता दाखल होईल.
पालखीचा ऐतिहासिक मार्ग पुन्हा एकदा सजीव
२००८ साली अखेरच्या वेळेस पालखी आळंदी मार्गे देहूला आली होती. त्यावेळी चिखली व टाळगाव परिसरातील नागरिकांनी भव्य स्वागत केले होते. यंदाही ही परंपरा जपली जाणार आहे.
देहू-आळंदी मार्गावरील गावांमध्ये भक्तांचा उत्साह; संस्थानचे विशेष आवाहन
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर डुडुळगाव, मोशी, चिखली, तळवडे या गावांतील भाविक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक प्रसंगी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, तसेच पालखी प्रमुख दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, इत्यादींनी पालखीचे शिस्तबद्ध, भक्तिपूर्ण आणि पारंपरिक स्वागत करण्याचे आवाहन केले आहे.
तारीख : 13-07-2025श्रेणी :महाराष्ट्र
प्रजावार्ता : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये प्रख्यात कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम, भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते आणि इतिहासकार मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे.
कोण आहेत उज्ज्वल निकम?
प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला, १९९३ बॉम्बस्फोट, गुलशन कुमार हत्या प्रकरण आणि इतर अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये यशस्वी बाजू मांडली आहे. मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र काँग्रेसचे वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
हर्षवर्धन शृंगला – परराष्ट्र धोरणातील दिग्गज
भारताचे माजी परराष्ट्र सचिव असलेले शृंगला यांनी अमेरिकेत आणि बांग्लादेशात भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले. ते G20 भारताध्यक्षतेचे समन्वयकही होते.
शैक्षणिक क्षेत्रातील दोन नावे
सी. सदानंदन मास्ते हे केरळमधील शिक्षण आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. तर मीनाक्षी जैन – इतिहास लेखिका, ज्यांना पद्मश्रीने गौरवण्यात आले आहे. ‘राम आणि अयोध्या’, ‘सती’ यांसारखी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत.
या चार नावांची निवड का झाली?
पूर्वीचे नामनिर्देशित सदस्य निवृत्त झाल्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून या नव्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. या निर्णयाची माहिती केंद्र सरकारकडून अधिकृतरित्या ट्विटर (X) वरून देण्यात आली आहे.
तारीख : 10-07-2025श्रेणी :महाराष्ट्र
पुणे (Pune) : पुण्यात १३ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा मंगळवार, १५ जुलै ऐवजी रविवार, १३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता हरीभाई व्ही देसाई महाविद्यालय, ५९६, बुधवार पेठ, शनिवारवाड्याच्या पाठीमागे, पुणे येथे पार पडणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी दिली.
या रोजगार मेळाव्याचे आयोजन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणे पोलीस आयुक्तालय, आणि हरीभाई व्ही देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
२००० हून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध
या मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील विविध औद्योगिक कंपन्यांकडून २ हजारांहून अधिक रिक्त पदांची मागणी करण्यात आली आहे. ही पदे १०वी, १२वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा धारक व प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) उमेदवारांसाठी खुली आहेत.
ऑनलाईन नोंदणी आवश्यक
रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी सोबत काय आणावे?
▪️ शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती
▪️ पासपोर्ट साइज फोटो
▪️ अर्ज / रेझ्युमे (Resume)
अधिक माहितीसाठी संपर्क:
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
४८१, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे - ४११००१
दूरध्वनी: ०२०-२६१३३६०६
तारीख : 07-07-2025श्रेणी :महाराष्ट्र
टाकवे बुद्रुक (Takwe Budruk) : पावसाळा सुरू होताच राजपुरी बेलज टाकवेला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने नागरीकांना तसेच वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर रस्त्यावरुन विद्यार्थी, कामगार, दुग्धव्यवसायिक यांना दररोज जावे लागत आहे. बेलज ते राजपुरी रस्त्यावर २०१७ नंतर शासनाचा कोणताही निधी पडला नसल्याचे सांगण्यात येत असुन परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतुन साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढुन चालावे लागत आहे.
टाकवे तसेच आंदर मावळातील अनेक कामगार याच रस्त्यावरुन नवलाख उंबरे या ठिकाणी औद्योगिक वसाहतीमध्ये कामावर जाण्यासाठी ये-जा करत आहेत. सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.
रस्त्यावर वाढत चालीये अवजड वाहतूक
राजपुरी तसेज बेलज परिसरात देखील आता क्रशर-खाणीची संख्या वाढत चाली असल्याने त्याची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यामुळे देखील रस्ता अधिक प्रमाणात खचत असल्याने याठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडत आहेत. याचा छोट्या वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तारीख : 06-07-2025श्रेणी :महाराष्ट्र
पवनानगर (Pawnanagar) : पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढला आहे. धरण सध्या ७६ टक्के क्षमतेने भरलेलं असून, जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने धरणाच्या सांडव्याद्वारे नदीपात्रात सुरू असलेला ४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
शनिवारी दि. ५ जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून, धरणातून ४०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात होते. त्यानंतर तो ८०० वर नेण्यात आला. परंतु धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वेगाने वाढून पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पूर्वीचा विसर्ग वाढवून तो १६०० क्यूसेक्सवर नेण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
पावसामुळे येव्यात वाढ – विसर्ग अजून वाढू शकतो!
सध्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण स्थिर असून, येत्या काही दिवसांत पावसात अधिक वाढ झाल्यास विसर्गाचा वेगही वाढवण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी अतिशय सावधगिरी बाळगावी. कोणीही नदीपात्रात पोहायला किंवा पाणी आणायला जाऊ नये. नदीपात्रातील पंप, शेतीसाहित्य, मोटारी, व जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना पूर्वसूचना देण्यात याव्यात आणि आवश्यक असल्यास स्थलांतराची तयारी ठेवावी. ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन, पोलीस व जलसंपदा विभागाशी संपर्कात राहून सहकार्य करावे, अशी सूचना करण्यात येत आहे.