तारीख : 22-06-2024श्रेणी :शेती
पवनानगर (Pawnanagar) : सद्या खरीप हंगाम चालू झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतावर मशागतीला वेग आला आहे. बहुतांश परिसरात सध्या भातरोपवाटिका टाकून झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने गावागावात कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. महागाव (ता. मावळ) येथे कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषी सहायक विकास गोसावी व मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यकामास शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी शेतकऱ्यांना भातपिकाबाबत सविस्तर मार्गदर्शन करताना कृषी सहाय्यक विकास गोसावी यांनी शेतकऱ्यांनी भात लागवड करताना चारसूत्री पद्धतीने दोरीच्या साहाय्याने १५ बाय २५ सेमी अंतरावर भात रोपे लागवड करावी. लागवडीनंतर युरिया ब्रिकेट खताच्या गोळ्या चार चुडाच्या मध्यभागी लावाव्यात. शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, पी. एम. किसान योजना, कृषी प्रक्रिया उद्योग पीएमएफएमइ योजना, खरीप हंगाम एक रुपयात पीक विमा योजना इ. योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
महागाव येथील खरीप हंगाम कृषी संजीवनी सभेस शेतकरी, कृषी मित्र, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक विकास गोसावी व ग्रामस्थांनी केले.
तारीख : 14-06-2024श्रेणी :शेती
चांदखेड (Chandkhed) : पाचाणे (ता. मावळ) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०२४-२५ खरीप हंगाम अंतर्गत सोयाबीन पीक उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरील शेतीशाळा वर्ग प्रकल्प संचालक, आत्मा पुणे व तालुका कृषी अधिकारी, मावळ यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. शेतीशाळेला कृषी सहाय्यक स्मिता कानडे यांनी मार्गदर्शन केले.
पाचाणे येथील पहिल्या शेतीशाळा वर्गात शेतीशाळा म्हणजे काय ? सोयाबीन पिक बियाणे निवड, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी,जैविक बिजप्रक्रिया करून पेरणी, बी. बी. एफ यंत्राने पेरणी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
खरीप हंगामातील सोयाबीन हे एक महत्वाचे व चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. सदर पिकास कृषी तंत्रज्ञानाची जोड देवून उत्पन्नात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना पीक अवस्थेनुसार पिकाची माहिती देण्यासाठी कृषी विभागाकडून शेतीशाळा घेण्यात येत आहे, असे कृषी सहाय्यक स्मिता कानडे यांनी सांगितले. सोयाबीन पिकाच्या पूर्व तयारी पासून ते काढणी पर्यंतचे टप्याटप्याने महिला शेतकऱ्यांना सहा वर्गामध्ये माहिती देण्यात येणार आहे. शेतीशाळा कार्यक्रमामध्ये महिलांची निवड, त्यांचा परिचय, बंद पेटी चाचणी व सांघिक खेळ घेण्यात आले.
तारीख : 18-05-2024श्रेणी :शेती
पुणे (Pune) : राज्यातील यंदाचा उसाचा गळीत हंगाम संपला आहे. १०३ सहकारी आणि १०४ खासगी, अशा २०७ साखर कारखान्यांनी यंदा १०७३ लाख टन उसाचे गाळप करून ११० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा उसाचा गाळप हंगाम संपला आहे. राज्यात १०३ सहकारी आणि १०४ खासगी, अशा २०७ कारखान्यांनी सरासरी दैनंदिन नऊ लाख टन क्षमतेने १०७३.९८ लाख टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.२७ टक्के साखर उताऱ्याने ११० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. मागील वर्षी १०५५ लाख टन उसाचे गाळप करून ९.९८ टक्के साखर उताऱ्याने १०५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
साखर विभागनिहाय कोल्हापुरात सर्वाधिक २८ लाख टन, पुण्यात २५ लाख टन, सोलापुरात २० लाख टन आणि नगर विभागात १४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. कोल्हापुरात सर्वाधिक ११.५९ टक्के, पुण्यात १०.५४ टक्के, सोलापुरात ९.४ आणि नगरमध्ये ९.९८ टक्के साखर उतारा मिळाला. कोल्हापूर विभागात ४०, पुण्यात ३१, सोलापुरात ५० आणि नगरमध्ये २७, छत्रपती संभाजीनगरमध्ये २२, नांदेडमध्ये २९, अमरावती आणि नागपूरमध्ये प्रत्येकी चार कारखाने सुरू होते.
अंदाजापेक्षा जास्त साखर उत्पादन
हंगामाच्या सुरुवातीस राज्यात ९० लाख टन उत्पादनाचा अंदाज होता. पण, सततच्या अवकाळी पावसामुळे राज्यभरात उसाची चांगली वाढ झाली. त्यामुळे साखर उतारा वाढला आणि उत्पादनात वाढ होत गेली. हंगाम अखेर आता ११० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. अंदाजापेक्षा २० लाख टनांनी जास्त साखर उत्पादन झाले आहे, अशी माहिती वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली आहे.
तारीख : 18-05-2024श्रेणी :शेती
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्री बिजनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राज्यातील फुलशेतीसाठी वरदान असून हा देशातील एक यशस्वी प्रकल्प आहे, असे राज्याचे सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार म्हणाले.
मॅग्नेट प्रकल्पांतर्गत के. एफ. बायोप्लांट व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १६) आयोजित फुले पिक उत्पादने व सुगी पश्चात संबंधी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, राष्ट्रीय सुगी तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुभाष घुले, उपसंचालक राजेंद्र महाजन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे, के. एफ. बायोप्लांटचे सरव्यवस्थापक आशिष फडके, आयसीएआर चे शास्त्रज्ञ डॉ.गणेश कदम, गणेश खिंड कृषी केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मोहन शेटे, डॉ.विष्णु गराडे, फूल उत्पादक शेतकरी आदी उपस्थित होते.
फुल शेतीमध्ये मूल्य साखळी विकसित होण्याची आवश्यकता असून यामुळेच फुलांचा समावेश मॅग्नेट प्रकल्पात केल्याचे सांगून श्री अनुपकुमार म्हणाले, तरुण फुल उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्टार्टअपच्या माध्यमातून या संधीचा फायदा घेतला पाहिजे. फुल शेतीमध्ये महाराष्ट्र राज्य हे एक अग्रेसर राज्य म्हणून पुढे आले असून नांदेड, धाराशिव आदी जिल्ह्यामध्ये फुल शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था हे फुल शेतीच्या मार्गदर्शनातील महत्वाची संस्था आहे, असेही ते म्हणाले.
कोकरे यांनी मॅग्नेट प्रकल्प बाबतची विस्तृत माहिती सादर करून फुल शेतीसाठी प्रकल्पाचे महत्त्व विषद केले. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी मूल्य साखळी विकसित करण्यासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
फलोत्पादन व फुल शेतीसाठी मुदत कर्ज व खेळते भाग भांडवलासाठी मॅग्नेट प्रकल्पाच्या एफआयएल घटकांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा फायदा फुल उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. अमोल यादव यांनी केले.
संरक्षित फुल शेती बाबत के.एफ. बायोप्लांटचे श्री. फडके, फुल शेती लागवड याबाबत आयसीएआरचे शास्त्रज्ञ डॉ. कदम यांनी व फुलांची काढणी व्यवस्थापन व निर्यात याबाबत पंडित शिकारे आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रामध्ये सर्व उपस्थित उत्पादक शेतकऱ्यांना सोएक्स फ्लोरा या फुलाची निर्यात करणाऱ्या कंपनीच्या प्रक्षेत्रास भेट देऊन त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या प्री कुलिंग,कोल्ड स्टोरेज ,पॅक हाऊस, फुलाची काढणी व विपणन या संदर्भात कंपनीचे संचालक नरेंद्र पाटील व सरव्यवस्थापक धनंजय कदम यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी तयार करण्यात आलेल्या 'फूल पीक माहिती पुस्तिकेचे' प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
कार्यशाळेस इंडिका फ्रेशचे पंडित शिकारे, मॅग्नेट प्रकल्पाचे कैलास कुंभार, नितीन पाटील, चेतन भक्कड, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व राज्यातील फुल उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
तारीख : 30-03-2024श्रेणी :शेती
टाकवे बुद्रुक (Takwe Budruk) : योग्य नियोजन असलं की शेतीत सर्व काही पिकवू शकतो. योग्य पाण्याचा वापर तोही ठिबक सिंचनाने, जीवअमृतचे खताचे पोषण, दशपर्णीअर्काची फवारणी आणि आठवड्यातून एकदा तोडणी अशाप्रकारे कमी जागेत भरघोस उत्पन्न माऊ येथील सातपुते कुटुंबानी घेऊन दाखविले आहे. तेही कोणत्याही रासायनिक खतावीणा.
जालिंदर गबळु सातपुते यांनी इतरांनी केलेल्या बोंबली शेंगाची लागवड पाहीली. आणि त्यांनीही हे पीक लागवड करण्याचा विचार केला. त्यासाठी बियाणे त्यांनी अहमदनगरहुन मागविली. डिसेंबरमध्ये शेतीची मशागत करून १० गुंठ्यात बियाणांची लागवड केली. फेब्रुवारीमध्ये घेवडा फुलोऱ्यावर आला व शेवटीला तोडणी चालू झाली. इतभर लांब शेंगा वेलाला लागल्या. सातपुते कुटुंब आठवड्याला गुरुवारी सकाळची तोडणी करतात आणि वडगावच्या बाजारात नेऊन विक्री करतात. आठवड्याला ३५० किलो घेवड्याचे उत्पादन मिळते. आणि बाजारात ७० रुपये किलोने विक्री होते. घेवडा पिकाबरोबर सातपुते कुटुंबानी उर्वरित १० गुंठ्यात कांदा, मिरची, टोमॅटो, वांगी यांचीही लागवड केली आहे.
सेंद्रिय शेतीमुळे ग्राहकांची पसंती
सातपुते कुटुंबानी कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता जीवअमृत (गूळ, बेसन, देशी गाईचे गोमूत्र व शेण, कडूलिंबाचा पाला, करंजाचा पाला यांचे मिश्रण ७ दिवस रापवून) यांचे मिश्रण पिकाच्या मुलाशी आठवड्यातून एकदा देतात. तसेच पिकाला कीड लागू नये म्हणून दशपर्णीअर्क (गोमूत्र, कडुलिंबाचा पाला, बेशरमची पाने, करंजाची पाने, धोत्रा पाने, एरंडा पाने, सीताफळाची पाने, कन्हेरची पाने, पपईची पाने, गुळवेल हे उकळून यांचे मिश्रण) यांची फवारणी आठवड्यातुन एकदा करतात. घेवडा पूर्णपणे सेंद्रिय व चवदार असल्याने ग्राहक पसंती देत आहेत व खरेदी करण्यासाठी आवर्जून संपर्क साधत आहे.
एवढा झाला खर्च
▪️ बियाण्यांना ५ हजार खर्च
▪️ ठिबक सिंचन, मोटार, मल्चिंग पेपर व शेततळे यासाठी ७० हजार खर्च
▪️ पाण्याची कसलीही सोय नसल्याने आठवड्यातून २ टँकरसाठी २ हजार रुपये खर्च
▪️ घेवडा विक्रीसाठी थोडाफार वाहतुकीचा खर्च
▪️ शेती करण्यासाठी घरचेच असल्याने मजुरांचा खर्च नाही वाचला.
"भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखले जाते. पण भारतात रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनी नपिक होत चालल्यात. आम्ही पूर्णपणे सेंद्रिय शेतीतुन घेवडा पीकविला आहे. त्यामुळे मागणीही चांगल्याप्रकारे आहे. ह्या पिकलागवडीसाठी आम्हाला आमचे पाहुणे संभाजी गुणाट यांचे मार्गदर्शन लाभले."
- जालिंदर गबळू सातपुते (शेतकरी)