तारीख : 18-03-2024श्रेणी :गुन्हेगारी
तारीख : 06-06-2025श्रेणी :गुन्हेगारी
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : तळेगाव एमआयडीसी रस्त्यावर सापळा रचून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या तीन गायी व दोन वासरांची सुटका करण्यात आली. बुधवारी (दि. ४ जून) रोजी रात्री सव्वा अकरा वाजल्याच्या नंतर सतर्क गोरक्षकांकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या ताब्यातील पिकअप टेम्पो, त्यामधील तीन गायी व दोन वासरे असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल वडगाव मावळ पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याप्रकरणी दर्शन संजय वहिले (वय ३०, रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, वडगाव मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिकअप चालक अमर बाळासाहेब पोखरकर (वय २७, रा. घाटकोपर वेस्ट मुंबई) आणि क्लिनर प्रशांत धोंडिराम पवार (वय २०, रा. घाटकोपर वेस्ट मुंबई) यांच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, खेड येथून देहूरोड येथे कत्तलीसाठी पिकअप टेम्पोमधून गायी आणि वासरांची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती फिर्यादी यांना बुधवारी (दि. ४ जून) रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांचे गोरक्षक साथीदार विजय मनोहर फाटक, महेश काशिनाथ गायकवाड, शुभम संजय धडवले, अजय दत्तात्रय गाडे, श्रीयोग उर्फ आकाश साहेबराव वारुळे, योगेश संजय ढोरे (सर्व रा. वडगाव ता. मावळ) यांच्या समवेत एमआयडीसी रोड, वडगांव मावळ येथे सदर पिकअप अडवण्यासाठी सापळा रचला. यावेळी महिंद्रा पिकअप एम एच ०३ ईएस १११७) हीच्यावर त्यांचा संशय बळावला असता त्यांनी तो थांबविला. त्यामध्ये तीन गायी व दोन वासरे दाटीवाटीने व चारा-पाण्याची सोय न करता भरलेली आढळून आली. तसेच आरोपी वाहनचालक आणि क्लीनरची चौकशी केली असता त्यांनी सदर जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपींसह पाच लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पो त्यामधील १ लाख रुपये किमतीची जनावरे असा एकूण सहा लाखाचा मुद्देमाल वडगाव मावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.
तारीख : 03-06-2025श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा (Lonavala) : मावळ तालुक्यात जमीन व्यवहारात झालेली फसवणूक ही काय नवीन घटना नाही. अनेकवेळा जमीन व्यवहारात अडकलेल्या आरोपींचे न्यान्यालयाने जामीनही फेटाळले आहेत. आता अशाच एका जमीन व्यवहारात मावळातील एक बडा नेता चांगलाच अडकल्याची बातमी समोर आली आहे. मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाचे तालुकाध्यक्ष यांच्यावर जमीन व्यवहाराबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
यशवंत रावजी मोहोळ (रा. तिकोना, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या तालुकाध्यक्षाचे नाव आहे. याप्रकरणी सुनील दिनदयाल गुप्ता (वय ५३, रा. भांगरवाडी, लोणावळा) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुकाध्यक्ष मोहोळ यांनी फिर्यादीची फसवणुक करण्याच्या उद्देशाने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या स्वतःच्या नावावर असलेली जमीन न दाखवता ठक्कर नावाच्या व्यक्तीच्या मालकीची पवना डॅम व्हीव व रस्त्यालगत असलेली जमीन दाखवली. व्यवहार करून फिर्यादीला दिलेल्या जमिनीच्या खरेदीखतात दाखवलेल्या चर्तुः सिमा व नकाशाप्रमाणे जमीन दिल्याचे भासवले. प्रत्यक्षात मात्र दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन दाखवून त्यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणुक केली. तसेच खरेदीखतात दिलेली जागा ही देखील फिर्यादीच्या आधी नथु केदारी (रा. अजिवली, ता. मावळ) यांना विसार पावतीद्वारे विकण्याचा प्रयत्न केला.
याबाबत फिर्यादी हे मोहोळ यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून ते राजकीय पक्षाचे नेते असल्याचे सांगून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे करत आहेत.
तारीख : 03-06-2025श्रेणी :गुन्हेगारी
कामशेत (Kamshet) : मावळ तालुक्यातील लोणावळा शहरालगत असलेल्या डोंगरगाव येथे पाळीव जनावरांना भूल देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न कसायांनी केला. मात्र सतर्क गोरक्षक आणि नागरिकांनी कसायांचा हा धाव उधळून लावत तीन पाळीव जनावरांना जीवनदान दिले. रविवारी (दि. १ जून) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
एक गाय व दोन बैल यांना भूल देण्यात आली असून या जनावरांवर उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसात हिंदुराष्ट्र सेना व बजरंग दल संघटनेकडून कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या अनेक जनावरांना जीवदान दिले होते. त्यामध्ये ५६ हजार टन गोमांस भरलेले दोन कंटेनर पकडण्यात आले होते.
स्थानिक नागरिकांनी जागरूक राहून आपल्या आजूबाजूला असे काही प्रकार घडत असतील तर गोरक्षकानां तत्काळ कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईसाठी सरपंच सुनिल येवले, संजय तिखे, दिनेश पाठारे, शैलेश धरपाळे, मयूर खैरे, अक्षय ठुले, संकेत निकम, हिंदुराष्ट्र सेना गोरक्षक चंद्रकांत बोंबले, माऊली आंद्रे, अजय शिळावणे, डॉ. सागर लोखंडे व शिवदुर्ग रेस्क्यू टिम सुनिल गायकवाड हे उपस्थित होते.
तारीख : 31-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा (Lonavala) : लोणावळा शहराजवळील वलवन धरणात बुडून एका सतरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. सदर मुलाचा मृतदेह शिवदुर्ग मित्र, लोणावळा रेस्क्यू पथकाच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
निलेश शिंदे (वय अंदाजे १७, रा. कासारवाडी, पुणे) पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. आपल्या १२ मित्रांबरोबर तो लोणावळा परिसर फिरण्यासाठी आला होता. त्यासाठी ते वरसोली येथून वलवण धरणाच्या मागील बाजूला गेले. आणि पोहण्याचा मोह अनावर झाल्याने ते पाण्यात उतरले परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने निलेश याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.
घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथक सर्व साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. पाणबुडीच्या सहाय्याने शोध मोहीम राबवत मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील वैभव दुर्गे, योगेश दळवी, मयूर दळवी, सागर दळवी, कपिल दळवी, आकाश मोरे, रोहित मोरे, महेश मसने, कुणाल कडू, महादेव भवर, पिंटू मानकर, सतीश सगर, सुनील गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
तारीख : 31-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
कामशेत (Kamshet) : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पिकअपची पंक्चर काढणाऱ्या दोघांना भरधाव मिक्सरने चिरडल्याची घटना घडली. आज (शनिवार दि. ३१) रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास किमी ६७/७०० ताजे (ता. मावळ) गावच्या हद्दीत हा अपघात घडला. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून मिक्सर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय कन्हैयालाल यादव (वय २५, वर्षे रा. मुंबई, कुर्ला गार्डन) आणि अफजल मुर्तुजा खान (वय ३९, रा. बजुरामपुर उत्तरप्रदेश) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पिकअपचालक राकेशकुमार नेतप्रसाद यादव (वय ३१, कुर्ला गार्डन मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक लेलंड कंपनीचा मिक्सर (MH 46 BS 5697) वरील चालक राजेश यादव (वय ३०, रा. उत्तरप्रदेश) याच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांची ताब्यातील पिकअप टेम्पो (MH 01 DR 7567) हा ताजे (ता. मावळ) गावच्या हद्दीत पंक्चर झाला. फिर्यादीने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा करून त्यांचे दोन सहायक अजय व अफजल पंक्चर काढत होते तर फिर्यादी हे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना दूर राहण्यासाठी इशारा करत होते. मात्र यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अशोक लेलंड (सिमेंट काँक्रीट मिक्सर) टेम्पोवरील चालकाने फिर्यादीच्या चेतावणी इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून फिर्यादीच्या पिकअपला पाठीमागून धडक दिली.
या अपघातात पिकअपच्या उजव्या बाजुला चाक खोलत असलेल्या अजय कन्हैयालाला यादव आणि अफजल मुर्तुजा खान या दोघांना ट्रकने चाकाखाली फरफटत चिरडत घेऊन गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातास, दोघांच्या मृत्यूस तसेच फिर्यादीचा पिकअप टेम्पो व त्यातील बॉयलर कोंबड्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी मिक्सर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.